शिक्रापुरात विद्युत वितरण कार्यालयात ग्रामस्थांचा घेराव

शिरूर तालुका

विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत केली रोहित्राची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन ग्रामस्थांना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून नुकतीच ग्रामस्थांनी महिलांसह शिक्रापूर विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयात मोर्चा काढत, घोषणाबाजी करत विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत अधिकाऱ्याला हार गांधीगिरी आंदोलन करत वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून ग्रामस्थांना कमी दाबाने वीज मिळत आहे. त्यामुळे येथील उद्योग व्यवसायांवर त्याचा परिणाम होत असल्याने ग्रामस्थांनी माजी उपसरपंच सुभाष खैरे यांच्या नेतृत्वाखाली विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला.

यावेळी शिक्रापूरचे माजी उपसरपंच रमेश थोरात, सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल खरपुडे, व्यापारी असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, किरण पुंडे, ज्ञानेश्वर शहाणे, चेतन फुलवरे, दिगंबर शेळके, वैजनाथ काळे, दत्तात्रय भुजबळ, किशोर सातकर, दादा महाजन, पल्लवी हिरवे, सविता शिवले, माई भोसले, उषा सातकर, वैशाली गोरडे, योगिता पायगुडे, वैशाली शहाणे, सारिका थोपटे, यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना निवेदन देत गांधीगिरी करत अधिकाऱ्यांना हार घालून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून वीज पुरवठा 8 दिवसात सुरळीत न झाल्यास मोठे आंदोलन करत विद्युत वितरण कार्यालयात ठिय्या मांडणार असल्याचे संतप्त महिलांनी सांगितले.

यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस हवालदार शंकर साळुंके यांनी सदर कार्यालयात हजेरी लावली यावेळी ग्रामस्थांच्या प्रश्नाबाबत वरिष्ठ कार्यालयाशी बोलणे झाले असून लवकर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी दिले.

ग्रामस्थांचा प्रश्न तातडीने सोडवला जाईल: नितीन महाजन

शिक्रापूर ग्रामस्थांनी केलेल्या मागणी बाबत आम्ही यापूर्वीच कार्यवाही करत स्वतंत्र रोहित्राची व्यवस्था देखील केलेली आहे. वरिष्ठांशी आजच चर्चा देखील केलेली असून ग्रामस्थांचा प्रश्न तातडीने सोडवला जाईल असे मत उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले.