देशात जातीधर्माच्या नावाखाली राजकारण सुरु; आनंदराज आंबेडकर

मुख्य बातम्या

ऐतिहासिक विजयस्तंभाला आनंदराज आंबेडकर यांची भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भयानक परिस्थिती असून केंद्राचे व महाराष्ट्राचे सत्ताधारी राज्याचे काय करु पाहत आहे असा प्रश्न पडत असून देशामध्ये जातीधर्माच्या नावाखाली राजकारण चालू आहे. तसेच कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये सीमावाद सुरु असून त्यामधून राज्यातील लोकांची मने दुभागत असून काही आठवड्या पूर्वी आसाम व मेघालय मध्ये जर वाद झाले त्यामुळे देशाला अखंड ठेवायचे कि नाही असा देखील प्रश्न पडत असल्याचे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे नुकतेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी केंद्रीय सचिव संजीव बोधनकर, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे, काजोल अहिरे, इतुल कांबळे, शिशोधन मोरे, कमलेश चाबुकस्वार, राकेश गायकवाड यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे त्यांच्यामधून महापुरुषांच्या बाबत अयोग्य पद्धतीचे भाष्य होत आहेत. ज्या महापुरुषांच्या मेहनतीने आज महाराष्ट्रातला तरुण उभा आहे त्या बहुजनांच्या मेहनतीवर अपमानास्पद भाष्य करणे हे चुकीचे असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना सांगणे आहे कि उगाच थोबाड चालवू नका, महाराष्ट्रातील जनतेची संवेदनशीलता संपत आहे जनता थोबाड लाल करेल असा इशारा त्यांनी देत आता शांततेचे वातावरण तयार करा, माणसामध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न निर्माण केला जात असल्याने देशातील एकात्मतेला भीती निर्माण होत असल्याचे सांगितले.

आधी बोलायचे आणि नंतर माफी नामे सादर करायचे हे थांबले पाहिजे, महाराष्ट्र हि संतांची भूमी असून संतांच्या विचारला तडे जाऊ देऊ नये, असे सांगत यावर्षी होणारा विजयस्तंभ अभिवादन दिन प्रचंड मोठा होणार आहे. सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर दोन पटीने समाज बांधव आलेले होते. मागील वर्षी प्रमाणे या वर्षी कोणतेही प्रतिबंद नाहीत त्यामुळे कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम मोठ्या ताकतीने होईल, असे देखील रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

विजयस्तंभ परिसराच्या विकासाबाबत बोलताना काही वर्षापूर्वी येथे उड्डाणपूल उभारू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते मात्र अद्याप पर्यंत येथे साधी वीट देखील ठेवण्यात आलेली नाही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आश्वासनाची पूर्तता करावी असे आवाहन देखील आनंदराज आंबेडकर यांनी केले.

पोलिसांनी ज्या पद्धतीने शाई फेकणाऱ्यावर गुन्हे दाखल केले त्या पद्धतीने जे महापुरुषांवर बोलतात त्यांच्यावर राष्ट्रदोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजे, परंतु देशातील पोलीस, ई डी, सिबीआय यांसह सर्वच यंत्रणा सरकारची पटीत झालेली असल्याने ते तशी हिम्मत करणार नाही, मात्र एखाद्या अधिकाऱ्याने तशी हिम्मत दाखवल्यास त्याला मी सलाम करेल.